शुक्रवार १३ फेब्रुवारी २००९

मी (पण) पत्रकार होणार!

अबतक च्या कार्यालयात संदीप न घाबरता शिरला. फॉर्मल शर्ट, टाय, ट्राउसर आणि कोट यात तो job_interviewअगदी   कंफर्टेबल फिल करत होता. त्याच्या चेहेऱ्यावरील आत्मविश्वास त्याच्या या धीटपणाची जणू साक्षच देत होता. न्यूज ऍंड मिडीया चा पदवीधारक असूनही संदीप एका संगणक प्रणाली तयार करणाऱ्या कंपनीत काम करत असे. बहुदा त्याला हे खटकत असावं. आपण जे शिकलो ते वाया गेल्याचंही त्याच्या मनात असेल कदाचित.

Interviewइतक्यात साक्षात प्रभूराम चंद्रा, अबतक चे प्रसिद्ध, अवॉर्ड विनिंग डायरेक्टर तेथे हजर झाले. नंतर कळलं  की तेच आज संदीप चा इंटरव्यू घेणार होते. आता त्याची खरी परीक्षा होती. रिसेप्शनिस्ट ने सांगितल्या प्रमाणे संदीप रुम नं ३४२ जवळ आला. टाय नीट केल्यावर त्याने दारावर नॉक केलं. “मे आय कम ईन सर?”. म्हणताच, “येस. प्लीज कम ईन.” असा आतून आवाज आला. झाली एकदाची इंटरव्यूला सुरूवात.

“प्लीज मेक युवरसेल्फ कंफर्टेबल मिस्टर संदीप”.

“आय ऍम ऑल राईट सर.” संदीपने हातातली फाईल टेबलावर ठेवत उत्तर दिलं.

“तर संदीप, तुला संदीप असंच म्हणतो आतापासुन, चालेल ना?”

“तेच बरं वाटेल सर. नाहीतर उगाच वय झाल्यासारखं वाटतं.” संदीपने ’आईस’ ब्रेक केला.

“बरं. मुद्द्याकडेच वळू थेट. तुझं शिक्षण या क्षेत्राशी रिलेव्हंट असलं, तरी सध्या तु काम करतोयस वेगळ्याच प्रकारचं. मग तु या पोझिशन साठी का अर्ज केलास?”

“सर, मनाला कुठेतरी खटकत होतं. आणि या क्षेत्रात काम करायची पॅशन आहे. मला खात्री आहे मी दिलेल्या संधीचं सोनं करेन.”

“वे टू गो. हं… तर बेसिकपासूनच सुरु करूया. मला सांग की तुला चॅनलचा स्क्रीन लेआउट आणि टायटल व मधील म्युझिक डिझाइन करायला सांगितलं, तर कसं करशील?”

“सर, इफ यू डोंट माईंड, मी तुम्हाला न्यूज रिडींग पासून इन्वेस्टिगेशन पर्यंत सगळ्या गोष्टींबद्दल मला असलेली माहिती देऊ का?”

“दॅट विल बी ऑसम! मला प्रश्नच विचारायला नको.” प्रभूंनी हसत होकार दिला.

संदीप खुर्चीवरून जवळजवळ उसळलाच! “सर, अगदी सोपं आहे.” आणि पुढे सांगू लागला. aajtakrq3“बातम्या सुरु होताना जे म्युझिक असतं ना, त्यात तबल्याचा मॅक्सिमम आवाज पाहीजे. गिटार, व्हायोलिन, मेंडोलिन, पियानो अशी लोकांना माहीत असलेली वाद्य त्यात वापरू नयेत. हायवेवर मोठ्या मोठ्या ट्रकचा हॉर्न जसा  वाजतो त्या आवाजशी साधर्म्य असलेलं वाद्य हवं. म्हणजे आधी हॉर्न – पॅ प प पॅ पॅ SSS पॅ प प पॅ पॅ SSSS मग तबला, धिट्ताक धिटताक…. आणि शेवटी एखादं मवाळ इन्स्ट्रुमेंट त त त तॅंव त तँव…” संदीप सारकॅस्टिकली सांगत होता. “काय आहे सर, सोसायटीतल्या जिन्यात सर्व घरातील टीव्ही ऐकू येतात. त्यात आपल्याच चॅनलचा आवाज उठून दिसायला हवा. त्या गोंगाटातही तो वेगळा ऐकू यायला हवा.”

प्रभूराम चंद्रा आश्चर्यचकीत झाले. पण नंतर त्यांनी विचार केला, की कदाचित विनोदनिर्मितीचा संदीप चा प्रयत्न असावा.

“मग एक सुटाबुटातील दाढी वाढलेला माणूस स्वागताला. देखतें है आजकी ताजा खबरे असं म्हणत त्याने २४ तास शिळ्या त्याच हेडलाईन परत द्यायच्या. हे करताना बेंबीच्या देठापासून ओरडणं फार महत्वाचं आहे. किमान २० चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या बातमीला एक्सक्लुजीव व ओनली ऑन अबतक असं डिक्लेअर करायचं.”

“स्क्रीन लेआउट तर फार महत्वाचं आहे. उजव्या कोपऱ्यात चॅनलचा प्रमाणाबाहेर मोठा असा लोगो हवा. screenत्या खाली लाईव कवरेज च्या वेळी त्याहूनही बेढब दिसणारी LIVE अशी चार लेटर हवीत. खाली १/४ स्क्रीन व्यापेल अशा पट्टीत BREAKING NEWS एवढंच निम्म्याहून अधिक वेळ लिहावं. त्याच एरियात एका चान्समधे वाचता येउ नये म्हणून एक ब्रेकिंग न्यून ४ वाक्यात तोडून दाखवावी. त्या पट्टीखाली स्टॉकचे भाव. त्याखाली छोट्या जाहिराती, त्याखाली लोकांनी पाठवलेले SMS – ‘dhoni is winner captain’, ‘mahi you make us praud’, ‘salman should quit’, ‘congress is good than bjp’ - शक्यतो त्या SMS ला एडिट न करता चुकांसह दाखवावेत. मग ’पिंकी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा व नंतर सुभेच्छुकांची मोठी रांग, काका, दादू, पवन, रिंकी, सोनू वगरे…  अणि रंगसंगती डोळ्यात भरायला हवी. थोडक्यात  काय, तर प्रेक्षकाला शून्य किंमत. तो शुद्र. त्याच्या डोळ्याला जास्तीत जास्त त्रास व्हायला हवा.”

 

काहीतरी सिरियस प्रॉब्लेम आहे हे प्रभूंच्या लक्षात आलं. “मि. संदीप..” असं त्यांनी म्हणताच4

“सर, लेट मी स्पीक.” संदीपने त्यांना थांबवलं. त्याचा आत्मविश्वास पाहून प्रभूंना पुढे बोलणं शक्य झालं नाही.

“बरं ब्रेकींग न्यूज म्हणजे काय? तर याला थंडी वाजली, त्याने रोटी खाल्ली, अमक्याचा कुत्रा हरवला, तमक्याला साधा ताप आला तरी लिलावती अस्पताल मे भरती. वर लोकांना त्याच्यासाठी SMS वरून शुभेच्छा द्यायला लावायच्या.”

“आठ आणि दहा वाजता तुमचे एक्सपर्ट बोलवायचे. त्यांनी लोकांच्या अंगावर ओरडून ओरडून कशालाही 1सत्य म्हणून खपवायचं. साधं खंडग्रास ग्रहण झालं तरी पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली यावर लेक्चर. निवडणूकीच्या वेळी राजकीय पक्षातील लोक गोळा करायचे आणि LIVE मंडई भरवायची. बरं, त्यात एक सेन्सीबल माणूस आणायचा. एकच. त्याला फार बोलूच द्यायचं नाही. सगळ्यांनी मिळून त्यावर हल्ला करायचा आणि एक्सपर्टनेही त्यात सहभागी व्हायचं. कधीमधी एखाद्या भडक वेशातल्या ज्योतिष्याला बोलवून पत्ते कुटायला लावायचे. कुठच्यातरी कोपऱ्यातील गावातील ’शादीत’ न बोलवता जायचं आणि त्या अडाणी लोकांना काहीतरी बरळायला लावून तोच विषय २-२ दिimage002वस कुटायचा. परत सांगतो, या सर्व गोष्टींपेक्षा जोरजोरात आरडाओरडा करणं हा पत्रकारितेसाठी अत्यावश्यक गुण(?) आहे.”

“पत्रकार शक्य तेवढे उरमट असलेले बरे. ईंटरव्यू मधे अतिथीलाच बोलून द्यायचं नाही. बायस्ड तर ईंटरव्यूवरनी असलंच पाहीजे. नाहीतर खटके कसे उडणार? कुठेकुठे फोन लावायचे आणि संबंध नसलेल्या माणसाचं मत विचारायचं. आणि अती शहाणपणा पत्रकाराच्या अंगी असलाच पाहीजे.”

“हम अभी खुलासा करने वाले है। असं म्हणून तासंतास मुद्द्याला हात न घालता बातम्या रंगवत बसायच्या आणि शेवटी फुसका बार उडवायचा.” image001

“मी आज खरंतर ईंटरव्ह्यूसाठी आलेलोच नाही” संदीप म्हणाला “आजकाल टीव्ही बघणं करमणूक राहिली नसून टॉर्चर झालं आहे. तशी एका अर्थी करमणूकच आहे म्हणा. जनता कशी बेशिस्त वागते सांगताना मिडियाला स्वत:च्या वागण्याची शुद्धच राहिली नाहीये.  भडकपणा म्हणजे पत्रकारीता असा समज झाला angry_02आहे तुम्हा लोकांचा. सेंसॉर वर टीका करताना आपण बिभत्सपणा ब्रॉडकास्ट करत आहोत हे पण तुम्हाला समजू नये? मिडीया देव! बाकी फाल्तु. असां तुमचा गैरसमज झाला आहे. २४ तासाची चॅनल चालवण्याच्या नादात तुमची क्वालीटी  एवढी घसरली आहे याचा तुम्हाला पत्ताच नाही. फिलर म्हणून सांस बहू और xyz असे2 कार्यक्रम तुमच्या चॅनलवर प्रवेश करु लागले आहेत. सनसनी सारखे कार्यक्रम पाहून देशात चांगलं काही आहे की नाही? अशी शंका येते. काय वाईट होतं दूरदर्शन काही वर्षांपूर्वीचं? निदान फिल्म डायरेक्टर्स ना तरी ’एक्सपर्ट’ म्हणून बोलवत नसत तेथे. बॉम्बस्फोटाचा कट कुठे रचला याची तुम्हाला माहिती असते तर मग ते सरकारला कळवत का नाही? आपल्या देशाच्या intelligence एजन्सीज अकार्यक्षम असतीलही कदाचित, पण एवढया अकार्यक्षम की तुमच्यासारख्या विद्वान पत्रकारांना त्यांच्या आधी माहिती मिळावी?”

 

job-interview_965823संदीप खुर्चीवरून उठत म्हणाला “सद्ध्या करतोय तो जॉब करायची मला हौस नव्हती, पण तुमच्यासारखी पत्रकारिता मला करायची नाहीये. आत्ता जे काम करतोय ते खरंच मला समाधान देतंय. अजून बरंच सांगायचं होतं, पण जाऊदे.”

 

shockedचंद्रा स्तब्ध झाले होते. संदीप गेल्याचं त्यांना कळलंच नाही. त्यांनी रिसेप्शनिस्ट व एच आर ला  बोलावून काही ईन्स्ट्रक्शन्स दिल्या व तातडीची बोर्ड मिटींग बोलवली.

 

 

 

आज अबतक चॅनल मधे बराच बदल घडला आहे. संदीप तेथेच सिनियर जर्नलिस्ट म्हणून काम करतो.

 

 

 

 

-किशोर

 

ईमेज रेफरन्स

http://oltsm.wordpress.com/2008/06/14/nadir-of-news-reporting/
http://www.advancedphotoshop.co.uk/users/1702/thm1024/job_interview.jpg
http://janeconstant.tripod.com/Interview.gif
http://images.askmen.com/better_man/keywords/job-interview_965823.jpg
http://www.coolfreeimages.net/images/angry/angry_02.jpg
http://ixwebhostwarning.files.wordpress.com/2008/12/shocked.jpg

शनिवार ७ फेब्रुवारी २००९

माझी भारतवारी (२००९)

अमेरिकेत शिक्षण घेण्याचे फायदे अनेक असतीलही, पण तोटेही (विशेषत: आर्थीक) कमी नाहीत. तुमच्या देशात तुम्हाला कोणी माणूस म्हणून वागवत नाही(?) म्हणून तुम्ही परदेशी आश्रय घेता, पण परत येता ते ’बकरा’ बनण्यासाठीच.  खोटं बोलत नाहीये, खरं तेच सांगतोय. आणि तेही उदाहरणासहीत!

तर २००८ च्या डिसेंबर च्या शेवटी मी असाच घरी परतलो. आपला देश, आपले लोक, आपलं जेवण परत मिळणार या विचाराने मन सुखावलं होतं. आमच्या देशात हीच कॉफी १/४ डॉलरला मिळते, जेवण तर अगदी स्वस्त! १$ ला एका वेळचं स्वदिष्ट पोटभर जेवण! तुमच्या त्या बर्गर च्या कानफटात मारेल असा वडापाव तर २० सेंट्स ला मिळतो असं कौतुक निघायच्या आधी इथल्या बऱ्याच लोकांना सांगून मोकळा झालो होतो.

आल्या आल्या लॅपटॉप उघडला तर कळलं की इथलं विजेचं सॉकेट वेगळं आहे. समोरच्या दुकानात गेलो. फ़्लॅट पिन टू राउंड पिन कन्वर्टर मागायला. ’फ्लॅट पिन’ हा शब्द उच्चारताच त्याच प्लॅस्टिकच्या ठोकळ्याची किंमत तिप्पट झाली होती. भारतातील पहिलाच दिवस असल्याने याकडे फार लक्ष दिलं नाही. म्हणलं हा कन्वर्टर काही सारखा आणावा लागत नाही. येताना विमानतळावरच्या स्वच्छतागृहात गेलो तर तिकडे २ रुपये मागितले. वर्षानंतर येणाऱ्याकडे २ रुपयाचं नाणं अशकय आहे हे तेथील लोकांनी बरोबर ओळखलं होतं. मग काय, दिलं एक क्वार्टरचं नाणं. म्हणलं काय दहा रुपयानी काय फरक पडणार आहे. पण हा ४० ने गुणायचा माईंडसेट लगेच (एक दोन दिवसांत) उतरला. इकडचे ४$ असले तरी तिकडचे २०० रुपये जास्त वाटू लागले.

एक सल्ला : भारतात गेल्याबरोबर लगेच तुम्ही तिथले कपडे घालायला सुरुवात करा. इथले कपडे आणि विशेषत: संध्याकाळी टोपी घालून खरेदीला जाल तर व्यापारी तुम्ही कोण गावचे हे लगेच ओळखतील. दुकानात जाउन कॅमेऱ्याचं कव्हर न मागता पाउच मागा. त्या पाउचमधे काय ठेवणार आहे त्यानुसार त्याची किंमत बदलत असते. आय पॉड वगरेचं तर नावही काढू नका.

बाकी येताना भाड्याने घेतलेल्या क्वालिसच्या ड्रायव्हरच्या कृपेने तिथल्या ट्रॅफिकची सवय होण्यास बरीच मदत झाली. त्यामुळे पहिल्याच दिवशी मी गाड्यांच्या घोळक्यातुन बरोबर बाईक बाहेर काढु शकलो. शेवटी जे रक्तात आहे, ते (डायालिसिस शिवाय) कसं पुसलं जाणार? नाही का? त्यामुळेच गाडी चालवताना आवश्यक असलेली आक्रमकता, जिद्द, चिकाटी, बेशिस्त परत मिळवायला वेळ लागला नाही.

बाकी, लोकांशी बोलताना फारच मजेशीर अनुभव आले. कोणालाही भेटायला गेलो तर "आमचा मुलगा/भाचा/पुतण्या/शेजारचा/जावई" पण तिथे असतो अशी माहिती मिळे. आता हे सुनील, अनिल, अजित, निलेश, चिंतामणी असे सगळे लोक लक्षात ठेवणं अशक्य होतं. बरं हे सांगण्यामागे यांचा हेतु काय हे कळायला काही मार्ग नव्हता. “अमेरिकेत कोणीही जाउ शकतं, त्यात काही कौतीक नाही” हे तर मी आधीच मान्य केलं होतं (आणि अनुभवलंही होतं. त्या ’कोणीही’ गटातलाच मी एक आहे). तुम्हाला सांगतो, एक वेळ हे ऐकून घेणं सोपं आहे पण "तिथं एकूण कसं आहे?" या प्रश्नाचं उत्तर देणं फार अवघड. बरं चांगलं खायला मिळेल या आशेने नातेवाईकांकडे जावं तर तिथेही फ्रेंच फ्राईज, पास्ता, पिझा असले भीषण पदार्थ खावे लागले. बरोबर चहा कॉफी ऐवजी काही लोकांनी ’कोक’ ही पाजलं. एका काकूंनी "खरच फरक पडलाय दिसण्यात आणि रंगात" असा शेरा दिला. आता त्यांच्या चेहेऱ्यावरील हावभावावरून हे कौतुक होतं, का त्यांना मी अमेरिकेत नसून वर्षेभर तुरुंगात असल्याची शंका होती हे सांगणं कठीण आहे. वर "आता काय तुम्ही डॉलरमधे कमावता!" असे टोमणे (मी खरंतर कमवत नसूनही) ऐकायला मिळाले.

एकूण काय, मी नंतर जास्तीत जास्त वेळ घरी रहायचं ठरवलं. उत्तम गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला. २० वर्षे न आवडलेल्या पालेभाज्या, गवार, दुधी अचानक मला आवडू लागला. डॉक्टर ची ट्रीटमेंट फार स्वस्त नसली तरी आवाक्याबाहेर अजूनही गेली नाही हे पाहून आनंद झाला. मित्रपरिवार भेटला आणि त्यामूळे ट्रीप मधे अजून रंगत आली. वडापाव बर्गर एवढाच महाग असून हॉटेलमधे मिनिमम २०० रुपये प्रत्येकी दिल्याशिवाय चांगलं जेवण मिळत नसल्याचा साक्षात्कार झाला.

तरीही परतीचा प्रवास त्रासदायक (मनासाठी आणि शरीरासाठीही) ठरला. पुणे मुंबई हे अंतर काश्मीर ते कन्याकुमारी मधील अंतराएवढं भासू लागलं. रेडिओवर "सागरा प्राण तळमळला" आणि फुड मॉल ला गाडी थांबली असता "लुका छुपी" ही गाणी कानावर पडली, आणि कधी नव्हे ते त्या गाण्यांच्या शब्दांकडेही लक्ष गेलं.