गुरुवार ६ मार्च २००८

भूत वर्तमान.... भविष्य ...

आज ऑफिसला जाताना अभूतपूर्व उत्साह जाणवत होता. "जग सुंदर आहे" हे कुठल्यातरी सिनेमातील वाक्य सारखं डोक्यात घुमत होतं. काल संध्याकाळी तर मी जाम वैतागलो होतो... समोर येईल त्याला चोप द्यावा अशा मूड मधे होतो... मग आज अचानक हा बदल कसा? हा विचार मनात येणं ठरलेलंच होतं. उगाच फाल्तु विचार करणं ही माझी नेहेमीची सवय, ती आज कशाला विश्रांती घेईल?... तेवढ्यात आठवलं, हा सकाळच्या गुड मॉर्निंग महाराष्ट्र मधील भविष्य पाहिल्याचा हा परिणाम!

नेहेमीप्रमाणे मी नऊ ला दहा कमी असताना झी मराठी लावलं.. आमची रास दहावी, त्या राशीचं भविष्य याच वेळेला असतं. आणि समोर हा नेहेमीचा Man आला. अत्यंत चतुरपणे केलेला पोषाख, कपाळी गंध, बसायला सिंहासनासारखी दिसणारी खुर्ची, मागे शोभिवंत पडदे, आणि खोलीत दरवळणारा अत्तराचा सुगंध (सुगंध खरं तर टी.व्ही. वरून कळत नाही, त्याची कल्पना करावी लागते... पण असा मसाला लावावाच लागतो.) अशा प्रोफेशनल वातावरणामुळे ह्याच्या भबिष्याचा सिरियसनेस द्विगुणित होतो. त्यातुन कशा झकास पंच लाईन टाकतात मधे मधे! मग काय! भविष्य पहायलाच हवं!

"विश्रांती नंतर पुन्हा आपणा सर्वांचं स्वागत (खरं तर आधीच्या नऊ राशींच्या लोकांनी टी.व्ही. एव्हाना बंद केलेला असतो). आज मार्गशीर्ष शु. ४ , मकर रास.. राशीच्या चतुर्थ स्थानी चंद्राचं भ्रमण आहे.. प्रत्येक दिवस हा वेगळा असतो.. आजचा दिवसही वेगळाच आहे.. आज तुम्ही पाऊले नीट टाकल्यास यश तुमचेच आहे. तुम्ही लोकांचा नेहेमी विचार करता पण लोकांपर्यंत ही गोष्ट दुर्दैवाने पोहोचू शकत नाही (?). पण आज तुमचा अनुभव वेगळाच असेल. तुमच्या सहकार्यांना आज तुमचे महत्च कळेल. सहाव्या स्थानातील गुरू तुम्हाला व्यावसायिक प्रगतीत साथ देईल. जोडीला मंगळ आणि नेपच्यून युतीमुळे अध्यात्मिक प्रगतीला वेग येईल! विद्यार्थ्यांना अभ्यासात घवघवीत यश मिळेल. संसारिक सुखाचा योग आहे. वाहन चालवताना आज काळजी घ्या. ....... कुंभ रास......" आणि......... टी.व्ही. बंद! :)

कर्नाटक हायस्कूलपाशी सिग्नल लागला. एकदम ताजंतवानं वाटत होतं पण मनात भविष्याचा विचार होताच. (आता विचार हे वाचनाच्या वेगपेक्षा जलद असतात. म्हणून हा पॅरा वाचायला तुम्हाला लागलेला वेळ आणि पन्नास सेकंदाचा सिग्नल या दोन गोष्टींची तुलना करणं लॉजिकली चुकीचं आहे)... असो. मी विचार केला, आज आपल्याला भविष्य उत्तम आहे असं दिसतंय.. सकाळी भविष्य सांगणाऱ्याने सर्व वयोगट कव्हर केले.. विद्यार्थी, संसारी मंडळी, कारकून, अध्यात्मात रस असलेले, आणि माझ्यासारखे लोकांचा विचार करणारे (मनात असा :D दात काढून हसलो). मग तान्ही बाळं सोडून राहिलं कोण?.. बेस्ट आहे! पुन्हा आत्मविश्वास परत आल्यासारखं वाटलं, आणि तेवढ्यात सिग्नल सुटला..

आता यापुढील जवळजवळ प्रत्येक पॅरा सिग्नल वर घडलेल्या प्रसंगाचं वर्णन करतो, त्यामुळे सुरुवातीचं सिग्नल लागणं आणि शेवटी सिग्नल सुटणं हे सारखं सारखं लिहीत नाही.

विचार केला, खरंच भविष्यावर विश्वास ठेवावा का? मला एक प्रसंग आठवला. रविवारी आम्ही सामना व सकाळ असे दोन पेपर घेतो. बाबांना भविष्य वाचण्याचा आणि ते आम्हाला वाचून दाखवण्याचा छंद आहे (थोरल्या माणसांसाठी 'खोड' हा शब्द वापरणं आपल्या संस्कृतीत बसत नाही :)) मी त्यांना पटवून देण्याचा बराच प्रयत्न केला. पण उपयोग नाही झाला. एके दिवशी ते सकाळ मधील भविष्य वाचून दाखवत होते.. नेहेमीचाच जनरल मजकुर "अमूक अमूक ग्रह अमूक स्थानात आहे. पुढील आठवडा तरूणांना उत्तम. नवे मित्र भेटतील" इत्यादी. नंतर त्यांनी सामना काढला, सुरुवातीची ग्रहांची स्थाने सारखीच.. पण पूढील मजकूर धक्कादायक! "गुरू बूध युतीमुळे आजार संभवतात. आर्थिक अडचणी येतील. मनासारख्या गोष्टी व्हायला अजून वेळ आहे. तुरूंगवासाची शक्यता! :o ". हे वाचून झाल्यावर सर्वांच्याच चेहेऱ्यावर विलक्षण भाव उमटला. बाबा म्हणाले "या सामना वाल्याला भविष्यातील काही कळत नसावं :)". त्या भविष्यातील शेवटच्या एका वाक्यामुळे आमचा पुढील प्रत्येक रविवार मात्र सुखकर केला!



ई टी.व्ही. वर एक प्रसिद्ध ज्योतिषी कार्यक्रम सादर करतात. ते लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. लोकांनी तज़्द्न्य ज्योतिष्यालाच पत्रिका दाखवावी असा त्यांचा आग्रह असतो. एकदा ते अंकशास्त्रावर एक कार्यक्रम सादर करत होते. प्रेक्षकांमधून काही लोकांना त्यांनी स्टेज वर बोलावले. प्रथम एक नगरसेवक महाशय स्टेज वर आले. त्यांची अंक कुंडली मांडून त्यांना ह्यांनी प्रश्न केला "तुम्हाला लोकांना मदत करण्याची, अन्यायाच्या विरोधात झगडण्याची आवड आहे.. बरोबर?" आता हे नगरसेवक कशाला संधी सोडतायत? "अगदी तंतोतंत बरोबर आहे सर तुमचं म्हणणं" नगरसेवकांनी पावती दिली... टाळ्यांचा कडकडाट झाला...... नंतर एक बाई आल्या. त्या पोलिस खात्यात उच्च पदस्थ अधिकारी होत्या. त्यांना विचारण्यात आलं - "तुम्ही एक स्त्री असूनही ऍग्रेसिव आहात.. अगदी जवळच्या नातेवाईकाने केलेली गंभीर चूक तुम्ही माफ करणार नाही.. बरोबर?". बाईंनी चेहेऱ्यावर समाधानाचे भाव आणत उत्तर दिले "बरोबर आहे सर!".. पुन्हा प्रचंड टाळ्या! लोक कार्यक्रमात इतके दंग होते की त्यांना ज्योतिषी बूवांची ही हुशारी कळलीच नाही...

मगाशी सांगितल्या प्रमाणे ज्योतिषी सगळ्या वयोगटांसाठी भविष्य सांगतात. यामुळे श्रोत्यांची संख्याही वाढते आणि भविष्य जास्त लोकांच्या बाबतीत खरं ठरायची शक्यता वाढते (एखाद्याचं भविष्य खोटं ठरलं तर तो स्वत:ला आजूबाजुच्या वयोगटात फिट करून आपले समाधान करुन घेतात).

श्रोते अगदीच निराश होवू नयेत म्हणून संकटे टाळण्यासाठी सोपे उपाय सांगितले जातात. ते असे उपाय असतात की आपोआप पाळले जाऊ शकतात. उदा. "मौनव्रत धरणं चांगलं". समजा संकट टळलं, तर माणूस विचार करतो "तसा आज मी फार नाहीच बोललो... गुरुजींनी सांगितलं ते अगदी खरं झालं हो!". अशा प्रकारे संकट आलं तरी गुरुजी बरोबर आणि टळलं तर गुरुजींना डायरेक्ट नमस्कारच! मी म्हणतो, जे होणार आहे ते सांगा ना! असं म्हणा की अमूक अमूक उपाय केल्याने संकट टळेल, पण तुमच्याच्यानी काही ते होणार नाहीत; तर आज मानसिक तयारी करुन ठेवा. अशा दोन्ही 'शक्यता' काय सांगता? शक्यता नको आम्हा भविष्य हवे!

आता ही वर वर बडबड वाटत असेल तर जरा गणिताचा आधार घेऊ (मला फार गणित कळत नाही, भावना समजून घ्या). भारतात दीडशे कोटी लोक राहतात, तुम्ही १२ च राशींमधे त्यांना विभागता.. म्हणजे प्रत्येक राशीचे साधारण साडे बारा कोटी लोक, साधारण तुमचं भविष्य ३० टक्के जरी बरोबर आलं तरी ३-४ कोटी लोक खुष! भारी! आणि ज्यांचं आज भविष्य खरं नाही झालं त्यांचं एक दोन दिवसात खरं होईल. आणि ते लोकही समजून घेतीलच की.. (अगदी पत्रिका बघूनही टीव्ही वरून कोणी "तुमचं लग्न होणारच नाही. काहीही करा!" असं ठामपणे सांगु शकत नाही. त्यामूळे वरील सगळ्या केसेस मधे थियरम बरोबर आहे)

सन साईन व मून साईन या दोन्ही प्रकारे भविष्य सांगता येत असलं तरी कोणीही या दोन्ही गोष्टी एकत्र करून भविष्य सांगत नाही त्यामूळे वरील गणित दोन्हीकडे लागू पडते. आजकाल ग्लोबलाइजेशन मुळे मात्र लोकांचा कल सन साईन कडे झुकत आहे.

होमवर्क: एकाच लेखकाने दिलेले वार्षिक ,साप्ताहिक व दैनिक भविष्य यावर करडी नजर ठेवून ते कन्सिस्टंट आहे का हे तपासून बघा.

सिजन प्रमाणे भविष्य सांगणे हा अजून एक प्रकार. खाली एक छोटी यादी देत आहे...
उन्हाळ्यात: "प्रवासाचा योग आहे" (कारण मुलांना सुट्या आहेत)
पावसाळा: "तब्येतीची काळजी घ्या"
दिवाळी, गणपती: "हा आठवडा आनंदात जाईल"
मार्च व एप्रिल: "विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती" (परिक्षा असतात या काळात)
जून-जूलै: "परदेश गमनाचे योग" (उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याच हा काळ)
असो! फार लांबवत नाही ही यादी.. नाहीतर तुम्ही देखिल ज्योतिषी व्हाल!

असा विचार करता करता ऑफिस जवळचा सिग्नल लागला. मागील आठवड्यात वाचलेले भविष्य माझ्या डोळ्यासमोर येत होते.. "नवसंवत्सरात शनी आणि गुरू या महासत्तांचा समतोल असाच या इतर ग्रहांच्या शुभयोगांना साथ देणारा आहे. त्यामुळेच काहींचे जीवन महासागराकडे झेपावेल*, यात शंका नाही. विशिष्ट दुर्मिळ वा अप्राप्य गोष्टी मिळणे, काही नवी माणसे जीवनात येऊन जीवनाचा फुलोरा वाढणे, जीवनातील वाद मिटणे, विशिष्ट स्थलांतरातून जीवनाचा कायापालट होणे, आणि मानसिक, शारीरिक संजीवन मिळून आध्यात्मिकतेकडे वाटचाल *होणे हेच गुरुभ्रमणाचे संवत्सरातील फलित होय! याचा लाभ मेष, मिथुन, सिंह, तुला, धनू आणि कुंभ या राशी निश्‍चितच घेतील याचा विश्‍वास वाटतो." [1] "आर्थिक उत्पन्नाची कमाल मर्यादा गाठता यावी यासाठी चार ग्रह धनस्थानातून भ्रमण करीत आहेत. उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. वकील, शिक्षक, प्राध्यापक, गायक, वादक, नर्तक **यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल.शासकीय कर्मचा-यांनाही एखादी पगारवाढ मिळू शकेल. स्वतंत्र व्यावसायिकांनी दर्जेदार तंत्रज्ञान वापरल्याने भरपूर फायदा होईल. नात्यागोत्यांतल्या माणसांचे प्रश्न सोडवण्यात बराच वेळ जाईल. विद्यार्थ्यांनी उत्तरांची वारंवार उजळणी करणे आवश्यक ***आहे. " [2] "समाजात नव्याने आपली ओळख तयार करावी लागेल. त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल. खर्चही बराच करावा लागणार आहे. मर्यादित साधनांचा पुरेपूर वापर करावा लागेल. त्यासाठी कौशल्य पणाला लावा. महत्त्वाचे व्यवहार करायला आजचा दिवस अतिशय चांगला आहे.संध्याकाळ मजेत जाईल.महिलांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. मुलांना अभ्यासात चांगले यश मिळेल.***" [3]


एवढ्यात सिग्नल सुटला.. मी घाईघाईत रस्ता क्रॉस केला व परिहार चौकात आलो. तेवढ्यात जोराचा आवाज झाला.............. नंतर कसाबसा उठलो, पण हात प्रचंड दुखत होता. आजच्या भविष्यातील शेवटचं वाक्य मात्र खरं ठरलं होतं!


* पंच लाईन्स
** सर्व समावेशक भविष्य
*** मार्च महीना.. परिक्षेचा काळ!

[1] http://www.esakal.com/esakal/11172007/Diwali_Bhavisha277AA3E450.htm
[2] http://www.marathiworld.com/bhavishya/month.htm March 2008
[3] http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2850184.cms


ताक: सर्व पात्रे काल्पनिक, सामना-सकाळची गोष्ट काल्पनिक.
जरी तुम्ही वरील लेख नीट वाचला नसेल तरी निदान सिग्नलची संख्या तरी मोजली असेल अशी आशा आहे. :) .